New Motor Vehicle Fines 2025: गेल्या काही वर्षांमध्ये रस्त्यावर अपघातांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. अनेक निष्पाप जीव वाहतुकीच्या नियमांमधील अज्ञान किंवा बेफिकीरीमुळे हिरावले गेले आहेत. म्हणूनच आता सरकारने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. १ मार्च २०२५ पासून ‘गोटार वाहन दंड कायदा २०२५’ लागू झाला असून आणि या नव्या कायद्यानुसार वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना डोळे पांढरे व्हावेत असा दंड भरावा लागणार आहे. एवढंच नाही, तर काही नियम मोडल्यास तुरुंगवास आणि समाजसेवेचीही शिक्षा होणार आहे.
आजवर नियम मोडून जराही फरक पडत नाही, असं समजून काही लोक बेधडक गाडी चालवत होते, पण आता हे वागणं खूप महागात पडणार आहे. दंडाचे नवे दर पाहिले की गाडी घराबाहेर काढण्याआधी दहा वेळा विचार करावा लागेल.
हेल्मेट नसेल तर संकट ओढवणार!
दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट घालणं अत्यंत आवश्यक आहे, हे आपल्याला माहिती असतं, पण तरीही अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. आता हेल्मेटशिवाय गाडी चालवताना पकडल्यास तब्बल १००० रुपये दंड आणि ३ महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होणार आहे. आधी केवळ १०० रुपये दंड होता, त्यामुळे लोक नियम पाळायला फारसे गंभीर नव्हते. आता मात्र या दंडामुळे प्रत्येकाने सावध राहणं गरजेचं आहे.
जास्त लोकांना घेऊन गाडी चालवली तर…
दुचाकीवर सर्रास चालक व एक प्रवासी यापेक्षा अधिक लोक प्रवास करताना दिसतात. पण आता दोनपेक्षा अधिक लोकांनी प्रवास केल्यास १००० रुपये दंड भरावा लागणार आहे. थोडक्यात, सुरक्षिततेसाठी आणि पैशासाठी ही चूक टाळणं चांगलं ठरणार आहे.
सीट बेल्ट नसेल तर थेट १००० रुपये दंड!
चारचाकी चालवत असताना सीट बेल्ट न लावल्यास पूर्वी फक्त १०० रुपये दंड होता, पण आता तो १००० रुपये झाला आहे. नियम पाळणं केवळ दंड टाळण्यासाठी नाही, तर आपला जीव वाचवण्यासाठी आहे, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं.
सिग्नल तोडल्यास ५००० रुपये!
रस्त्यावर गाडी चालवत असताना सिग्नल तोडणं म्हणजे आपल्याच जीवाशी खेळणं आहे. आता यासाठी ५००० रुपये दंड आकारला जाईल. पूर्वी केवळ ५०० रुपये दंड होता, पण नव्या कायद्यानुसार या नियमाचं उल्लंघन केल्यास खिशाला चांगलाच मोठा फटका बसणार आहे.
गाडी चालवताना फोनवर बोलणं महागात पडणार!
गाडी चालवताना फोनवर बोलणं ही चूक काहीजण सहजपणे करतात. पण यामुळेच अनेक अपघात देखील घडतात. आता यासाठी ५००० रुपये दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे फोन बाजूला ठेवून, दोन्ही हातांनी व्यवस्थित गाडी चालवा.
वेग आणि स्टंटिंगसाठी ५००० रुपये दंड!
जास्त वेगाने गाडी चालवणं, स्टंट करणं आणि धोकादायक पद्धतीने गाडी चालवणं या गोष्टी आता फार महाग पडणार आहेत. यासाठी ५,००० रुपये दंड निश्चित करण्यात आला आहे. रस्त्यावर स्टंट दाखवणाऱ्यांसाठी हा थेट इशाराच आहे.
मद्यप्राशन करून गाडी चालवणं म्हणजे संकटाला आमंत्रण
दारू पिऊन गाडी चालवत असताना पकडल्यास १०,००० रुपये दंड आणि/किंवा ६ महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो. दुसऱ्यांदा अशी चूक केल्यास दंड १५,००० रुपये आणि/किंवा २ वर्षांपर्यंत तुरुंगवास होणार आहे. आपल्यासोबतच इतरांचे प्राण धोक्यात घालणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे.
रुग्णवाहिकेला अडथळा निर्माण कराल तर थेट १०,००० रुपये दंड!
रुग्णवाहिका किंवा इतर आपत्कालीन सेवा जात असताना अनेकदा लोक बाजूला होण्याऐवजी आडवे उभे राहतात. आता अशा वर्तनासाठी थेट १०,००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर आता ५००० रुपये दंड!
ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय गाडी चालवणं ही खूप मोठी चूक आहे. यासाठी पूर्वी फक्त ५०० रुपये दंड होता, पण आता ५,००० रुपये दंड ठोठावला जाणार आहे. इन्शुरन्स नसेल तर २,००० रुपये दंड आणि/किंवा ३ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता आहे.
१८ वर्षांखालील मुलांनी गाडी चालवली तर आई-वडिलांना मोठा दंड!
जर एखादं मूल, जे १८ वर्षांचं नाही, गाडी चालवत असेल, तर २५,००० रुपये दंड, ३ वर्षांचा तुरुंगवास आणि त्या गाडीची नोंदणी एक वर्षासाठी रद्द होणार आहे. एवढंच नव्हे तर त्या मुलाला वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत लायसन्स दिलं जाणार नाही. त्यामुळे पालकांनी योग्य ती काळजी घ्यावी.
या नव्या नियमांमुळे वाहतुकीचा शिस्तबद्धपणा वाढेल आणि अपघातांचं प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा आहे. नियम पाळणं म्हणजे जबाबदारीने वागणं. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखावी आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं. अन्यथा, फक्त दंडच नाही तर स्वतःच्या आणि इतरांच्या जीवालाही यामुळे धोका पोहोचू शकतो.